
आता जळगावातच होणार आधारच्या क्लिष्ट त्रुटींचे निराकरण
मुंबईच्या फेऱ्यांपासून सुटका; आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र नागरिकांसाठी सुरू
जळगाव | प्रतिनिधी
आधार कार्डावरील क्लिष्ट त्रुटी दुरुस्त करणे, रखडलेले बायोमेट्रिक अपडेट किंवा इतर तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आता जळगावकरांना मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या पुढाकारातून आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) माध्यमातून शिरसोली रोडवरील मिश्री हाइट्स, डी-मार्टजवळ अत्याधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक कॅप्टन लवकेश ठाकूर यांच्या हस्ते, तहसीलदार शीतल राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यापूर्वी आधारशी संबंधित क्लिष्ट तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी जळगाव व ग्रामीण भागातील नागरिकांना मुंबईला जावे लागत होते. यासाठी प्रत्येक फेरीत दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च आणि दोन दिवसांचा वेळ खर्ची पडत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
नवीन ग्राहकसेवा केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता सर्व सेवा जळगावातच उपलब्ध होणार असून प्रवास, वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे दरमहा शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार असून लाखो रुपयांची आर्थिक बचतही होणार आहे.





