
Breking : राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रायगडसह अनेक जिल्ह्यांत खांदेपालट
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर अधिकारी बदल्या करण्यात आल्या असून, 22 पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे काही जिल्ह्यांमध्ये अचानक झालेले बदल चर्चेचा विषय ठरत आहेत.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली ठाणे शहर पोलिस दलात उपायुक्तपदी करण्यात आली आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची नेमणूक बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी झाली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी पुणे शहर पोलिस दलातील गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली करून त्यांची नियुक्ती आता नव्याने निर्मित अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदीही बदल करण्यात आला आहे. सध्याचे एसपी संजय जाधव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. रितू खोकर यांच्यासमोर तुळजापूरमधील अलीकडील ड्रग्ज प्रकरण, तसेच जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
दरम्यान, संजय जाधव यांना सध्या कोणतीही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नसून, त्यांना स्वतंत्रपणे नवे पद देण्यात येईल, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील या बदल्यांमुळे अनेक जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.