अंतुर्ली भागात गारपीट अन् वादळाने केळी बागा उद्ध्वस्त

अंतुर्ली भागात गारपीट अन् वादळाने केळी बागा उद्ध्वस्त
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
मुक्ताईनगर प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वादळी पाऊस, तीव्र गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील नगदी पीक असलेल्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे खचला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. ऐन मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतेत असून केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः दखल घेतल्याने आता दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अंतुर्ली आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भांडवल मातीत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी स्थानिक भाजप पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमवेत शेतांमध्ये जाऊन पिकांच्या दुरवस्थेची पाहणी केली. शेतकऱ्यांनी सोसलेल्या या अतोनात नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
कृषी विभाग आणि विमा कंपन्यांना हायअलर्ट; तत्परतेचे आदेश
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. झालेल्या नुकसानीची केवळ कागदोपत्री नोंद न घेता त्याचे प्रत्यक्ष पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकसान भरपाई मिळण्यात शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना यापूर्वीच कडक सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांचे जाहीर आवाहन
पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी कोणतीही वेळ न दवडता कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन केले. आपल्या नुकसानीची अचूक माहिती प्रशासनापर्यंत तात्काळ पोहोचवावी, जेणेकरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आर्थिक मदत आणि विम्याचा लाभ मिळवून देणे शक्य होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांच्या कामाला आता मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.





