
संत सखाराम महाराज वाडी संस्थानातील आगग्रस्त परिसराची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाहणी
अमळनेर, अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थान परिसरात लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. संत सखाराम महाराज वाडी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या दुर्घटनेमुळे मोठी हानी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच पंचनामे त्वरित पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
“संत सखाराम महाराज वाडी हे सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल आणि या पवित्र स्थळाचा वैभवशाली वारसा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.





