
कंडारी येथे किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या ; दोन संशयित ताब्यात
भुसावळ I प्रतिनिधी
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही तासांत खुनातील दोघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी, दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून झालेल्या या खुनाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसह कंडारी गावात वैयक्तिक कारणासाठी गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. तो वाद चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात PSI गोरे, पोकॉ सिद्धेश डापकर, रतन गीते, सलीम तडवी, मयूर निकम, किशोर पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल नरवाडे आणि शनिपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी योगेश साबळे यांचा समावेश होता.
या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक केली. या आरोपींची नावे राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजीनगर, जळगाव) आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजीनगर, जळगाव) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासाच्या दिशेने निर्णायक हालचाल करत दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मोलाची भूमिका बजावली.
भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर कोणतेही सहकारी गुन्ह्यात सामील आहेत का, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.





