
विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पतीवर ढकलल्याचा माहेरच्यांचा आरोप
यावल (प्रतिनिधी) – महेलखेडी (ता. यावल) येथील २० वर्षीय मुस्कान अल्ताफ तडवी हिने सासरी जात असताना पतीसमवेत असलेल्या दुचाकीवरून खाली उतरून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विरावली गावाजवळ गट क्रमांक ५७ मधील शेतात घडली.
मुस्कान हिला घेऊन तिचे पती अल्ताफ रहेमान तडवी हे दुचाकीने महेलखेडीकडे जात होते. वाटेत मुस्कानने दुचाकी थांबवण्याची विनंती केली व थेट शेतातील विहिरीत उडी घेतली. प्रकार लक्षात येताच पतीने आरडाओरड केली. जवळच्या नागरिकांनी धाव घेत तिला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्कानच्या माहेरील नातेवाईकांनी तिच्या पतीवरच तिला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.