
अनधिकृत वाळू वाहतुकीवर कडक कारवाई ; वाहन परवाना निलंबन व रद्द करण्याचा निर्णय
राज्य परिवहन प्राधिकरणाचा इशारा; गुन्ह्यांच्या पुनरावृत्तीवर परवाना रद्द होणार
मुंबई प्रतिनिधी I राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार वारंवार उघड होत असल्याने महसूल आणि पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे. ही हानी थांबवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, अनधिकृतपणे खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परवाना निलंबित करणे, वाहन अटकाव करणे आणि पुनरावृत्ती झाल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
निर्णयानुसार, पहिल्या गुन्ह्यात वाहनाचा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करून वाहन अटकाव केले जाईल. दुसऱ्या गुन्ह्यात परवाना ६० दिवसांसाठी निलंबित राहील, तर तिसऱ्या गुन्ह्यात वाहन थेट अटकाव करून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११३ चा भंग करून सकल भारक्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना या निर्णयाची अंमलबजावणी एकसारख्या पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.





