
जळगावातील ४९ वर्षीय इसमाने उचलले टोकाचे पाऊल..
जळगाव (प्रतिनिधी) –कोणत्या ना कोणत्या कारणाने जळगाव शहरासह जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस येत असून शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (२२ मे) सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ईश्वर वाघ हे आपल्या पत्नी, एका मुलगा आणि एका विवाहित मुलीसह समता नगरमध्ये वास्तव्यास होते.
भंगार विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबीय झोपले, परंतु सकाळी उठल्यानंतर ईश्वर वाघ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले, परंतु तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे वाघ कुटुंबीय आणि परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयात नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.