
गिरणा नदीत गणेश विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू; ममुराबाद गावात शोककळा
जळगाव : गणेश विसर्जनाच्या आनंदावर शनिवारी (६ सप्टेंबर) दुर्दैवी काळोख पसरला. ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी (वय २७) हा तरुण पाळधी-तरसोद दरम्यान नव्या पुलाखाली मूर्ती विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला.
गणेश कोळी आपल्या आई-वडिलांसह आणि बहिणीसोबत घरगुती गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीवर गेला होता. सायंकाळी सुमारे सहा वाजता मूर्ती विसर्जनासाठी तो नदीत उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला. कुटुंबीयांनी हाकाटी करून मदतीचा प्रयत्न केला, पण मोठ्या पाण्यामुळे त्याला वाचवता आले नाही.
शोधकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे बचाव मोहिमेत अडथळे आले. रविवारी (७ सप्टेंबर) सकाळपासून आव्हाणे, वदनगरी, खेडी, फुपनगरी आणि कानळदा परिसरात नदीकाठावर शोध पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
धरणातून मोठा विसर्ग
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून ९७६८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरण ९६ टक्के भरले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेने ममुराबाद गावात शोककळा पसरली असून, गणेशच्या अकाली निधनाने कुटुंबियांसह नातेवाईक आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





