
पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शेतात काम करत असताना उष्माघाताने एका तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. रघुनाथ वाल्हे असे मृत मजुराचे नाव असून त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे
रघुनाथ वाल्हे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. हाताला मिळेल ते काम करून ते पत्नी, दोन मुले आणि एका मुलीचा सांभाळ करत होते. सध्या ते धान्य काढणीच्या यंत्रावर मजुरीचे काम करत होते. मंगळवारी दुपारी देविदास पाटील यांच्या शेतात बाजरी काढणीचे काम सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. उष्णतेचा प्रचंड तडाखा आणि कडक उन्हामुळे त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घरातील कर्ता पुरुष गमावल्याने वाल्हे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





