
जळगावात कोळशाच्या मालगाडीच्या बोगील आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जळगाव: शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या एका मालगाडीच्या बोगीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही आग उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या नवीन तिकीट घराच्या जवळ लागल्याने खळबळ उडाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या एका बाँम्बने आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला .
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीमधून अचानक धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास या घटनेची माहिती तात्काळ शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान तातडीने बंबासह घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन दलाची गाडी पोहोचताच वाहन चालक किरण महाजन, फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
ही घटना शहरातील गजबजलेल्या नवीन तिकीट घर परिसरात घडल्याने आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, कडक ऊन आणि कोळशामधील अंतर्गत उष्णता किंवा घर्षणामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.





